श्रीमंत, सार्वजनिक वाहतूक, आणि दूरचा दिवा

इमेज
  काही दिवसांपूर्वी डॉ. अजित रानडे ह्यांचे एक विधान चर्चेत आले. त्यात त्यांनी विकसित देशाची काही लक्षणे सांगितली होती. त्यातले एक लक्षण होते – ते म्हणजे विकसित देश ही अशी अवस्था आहे जिथे श्रीमंत लोकही पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बसेस , रेल्वे , मेट्रो ह्यांनी प्रवास करतात. भारतातील, विशेषतः महानगरांतील सार्वजनिक वाहतुकीची अवस्था माहित असलेल्या लोकांना हे विधान किती आश्चर्यकारक आहे हे सहज कळेल. थोडक्या शब्दात सांगायचं तर at present, travelling by public transport in Indian cities is an indignity where your identity is crushed by crowd, queue, and delays. पण डॉ. रानडे हे उगाच विधाने करणारे आहेत असं मला , मी आजवर त्यांचं जे वाचलं-ऐकलं आहे त्यातून वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्या विधानावर थोडा विचार केला. डॉ . रानडे ह्यांचे विधान हे आदर्शवादी आहे हे कळणे कठीण नाही . आपण जे वास्तव अनुभवत आहोत त्यात आपल्या परिचयातील सधन व्यक्ती ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरत नाहीत. आपण ज्या कार्यालयांत काम करतो तेथील उच्चपदस्थ हे स्वतःच्या वाहनांनी कार्यालयात येतात असं अनेकांचं निरीक्षण असेल.

विनय सीतापती ह्यांचे ‘जुगलबंदी’

मी ह्या अगोदरचे विनय सीतापती ह्यांचे पी.व्ही. नरसिंहराव ह्यांचे चरित्र  ‘हाफ लायन वाचले होते आणि ते मला आवडले होते. हे चरित्र भक्तिभावाने नाही तर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले होते, पण तरीही ते ओघवते होते. पी.व्ही. नरसिंहराव ह्यांना इतिहासात पुनर्वसित करण्याचा प्रयत्नात ह्या पुस्तकाचा मोठा वाटा असणार आहे. अमित वर्मा ह्यांची ‘the seen and the unseen’ podcast आहे त्यात एका भागात सीतापती आले होते. ह्या podcast चा सुरुवातीचा भाग ऐकून मी पुस्तक वाचायचं ठरवलं. (पुस्तक न वाचताच पुस्तकाचं सार समजून घ्यायचं असेल तर podcast ऐका.)

प्रतिमासौजन्य - Penguin Random house 

जुगलबंदी हे अत्यंत ओघवतं, अगदी unputdownable म्हणता येईल असं पुस्तक आहे. वाजपेयी आणि अडवाणी ह्या जोडगोळीचा राजकीय उदयास्त ही पुस्तकाची थीम आहे. पण थीम हिंदुत्ववादी राजकारणाच्या चिकित्सेचे निमित्त आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. पण पुस्तकात लेखकाने narrative आणि analysis ह्यांना वेगळं ठेवलेलं आहे. मुख्य प्रकरणे जनसंघाची स्थापना ते २००४ सालचा NDA चा पराभव ह्या कालवधीत वाजपेयी-अडवाणी ह्यांची राजकीय कारकीर्द कशी होती हे सांगतात. हे सांगण्याची लेखकाची शैली एखाद्या gripping thriller सारखी आहे. पुस्तकाच्या उपोद्घातात हिंदुत्ववादी राजकारणाची वैचारिक समीक्षा आणि लेखकाच्या मांडणीचा अन्य वैचारिक फ्रेमवर्कसोबत तौलनिक अभ्यास आहेत.

थोडक्यात सांगायचं तर जुगलबंदी elevates Advani and demotes Vajpayee. आज समोर असलेली वाजपेयी (भारतरत्न) आणि अडवाणी (अपरिहार्यपणे अडगळीत गेलेला  मोहरा) अशा प्रतिमा आणि पुस्तकाचे narrative हे वेगळे आहे.  

वाजपेयी ह्यांच्या बाबतीत एक प्रकारे प्रतिमाहननाचे कामच सीतापती करतात. वाजपेयी ह्यांच्या जीवनातील राजकुमारी कौल ह्यांचे स्थान, त्यावरील संघ-जनसंघ आणि वाजपेयी ह्यांच्यातील तणाव, कौल ह्यांनी वाजपेयी ह्यांच्या उदारमतवादाला खतपाणी घातले.आकार दिला हे सीतापती ह्यांनी व्यवस्थित मांडलेले आहे. वाजपेयी ह्यांच्या खाजगी जीवनाबद्दल इतकी सविस्तर चर्चा मी आधी वाचलेली नव्हती. अडवाणी हे तुलनेने बऱ्याच काळ वाजपेयी ह्यांच्या छायेत असलेले आणि उशिराने स्वतःचे राजकारण सुरु केलेले असे येतात. अर्थात विचारधारेची शिदोरी, नव्या पक्षात दोघांची सुरुवातीला झालेली वेगवान वाढ अशा काही गोष्टी दोघांसाठी सामाईक आहेत. पण वाजपेयी एक व्यक्ति म्हणून स्वतःला assert करणारे आणि किंबहुना नंतर ती प्रतिमा आणि ideology आधारित पक्ष आणि पक्षाचा पाया असलेला संघ ह्यांच्या संघर्षात कायम अडकलेले आणि तो संघर्ष, त्यांच्या शेवटच्या अनपेक्षित पराभावापर्यंत खुबीने हाताळणारे असे नेते म्हणून समोर येतात, तर अडवाणी हे reluctant पण संधी मिळताच कौशल्याने राजकारण करणारे नेतुत्व म्हणून समोर येतात.

Podcast मध्ये सीतापती ह्यांनी पुस्तकाच्या मध्यवर्ती बिंदूचा उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे वाजपेयी-अडवाणी आणि मोदी-शहा ह्यांच्यामधला फरक. हा फरक अमित शहा ह्यांच्याच शब्दात आहे. हा फरक आहे तो हिंदुत्वाला राजकीय भूमिका म्हणून स्वीकारायचा. वाजपेयी-अडवाणी कायम ताकास जाऊन भांडं लपवत होते जे मोदी-शहा करत नाहीत.

सीतापती संसदीय लोकशाहीला वाजपेयी आणि अडवाणी ह्यांना हिंदुत्वाच्या आक्रमक पवित्र्याच्या तुलनेत  मवाळ भूमिका घ्यायला लावण्याचं थोडं क्रेडीट देतात. वाजपेयी ह्यांच्या बाबतीत नेहरूंचा प्रभाव हेही एक सुप्त कारण असावं असं वाटत राहतं, अर्थात सीतापती तसं थेट म्हणत नाहीत. सितापतींच्या मते लोकशाही राजकारण हे हिंदुत्वाशी सुसंगत आहे आणि म्हणून भाजप हा लोकशाही राजकारणाला धरून वागत आहे. ह्या मुद्द्याला दोन बाजू आहेत, एक म्हणजे हिंदुत्वाच्या विश्वकल्पनेत (वर्ल्ड व्ह्यू) शासन/स्टेट कसं असावं ह्याची काही ठाम कल्पना नाही, ज्यामुळे निवडणुका आधारित सरकारनिवड हे मॉडेल default असल्यागत हिंदुत्वाने स्वीकारलेलं आहे. आणि दुसरं, महत्वाचं आणि काही प्रमाणात पहिल्या कारणावर प्रभाव टाकणारं कारण म्हणजे आज आपण ज्याला हिंदुत्व मानतो आहेत ती ideological चळवळ हीच मुळांत लोकशाहीच्या बहुसंख्य मते जिंकतील ह्या गुणधर्मावर उदयाला आलेली आहे असे सीतापती मांडतात. म्हणजे हिंदू बहुसंख्य असणं ही बाब हिंदुत्ववादी पक्षाच्या लोकशाहीत सत्ताधारी बनण्याला अनुकूल आहे हे लक्षात घेऊनच हिंदुत्वाचा उदय झालेला आहे असं सीतापती ह्यांचं म्हणणं आहे. ही दिशा पुढे नेली तर असं म्हणता येईल कि भारतात आज भाजप सत्तेत आहे हे आश्चर्य नाही, तो इतके वर्ष सत्तेत नव्हता हे आश्चर्य आहे! मला स्वतःला वाटतं कि भारतातला हिंदू पुनरुज्जीवनवाद हा अजून जुना असावा (म्हणजे इस्लामी आक्रमणानंतर जी बदलाची जाणीव निर्माण झाली त्यातच त्याचे बीज असावे असेही म्हणता येईल.), पण हिंदुत्वाच्या otherwise व्यक्तीवादाकडे हेटाळणीने बघण्याच्या दृष्टीत लोकशाही कशी काय बसते ह्याबाबतीत सीतापती ह्यांची मांडणी कदाचित जुळत असावी.

सीतापती कुठे अचूक आहेत तर ते भाजपच्या ‘मुस्लीम आणि अन्य अ-हिंदू हे हिंदूंच्या विरुद्ध म्हणजे पर्यायाने भारताविरुद्ध कारस्थान करत आहेत, ह्या कारस्थानाविरुद्ध pre-emptive असणं आणि त्यासाठी हिंदू मते एक होणं ज्यासाठी जातीपातीच्या भिंती अधिकाधिक सच्छिद्र होणं’ ह्या मांडणीला अचूक पकडतात. (ही मांडणी बरोबर आहे का चूक हा मुद्दा नाही, ही मांडणी वापरली जाते हा मुद्दा आहे.) वाजपेयी आणि अडवाणी ह्यांनी ही मांडणी फारशी वापरली नाही, पण त्यांच्याच कारकिर्दीत ह्या मांडणीचा प्राथमिक अविष्कार झाला हे सीतापती हे दर्शवतात. २००२ ची गुजरात निवडणूक आणि त्या आधीचे गोवा अधिवेशन हा घटनाक्रम त्यांनी सविस्तर मांडलेला आहे.

सीतापती ह्यांचे पुस्तक हे जर भाजपचे सरकार आले नसते तर प्रत्यक्षात आले असते का असा एक विचार मनात येतो. सीतापती ह्यांची दोन्ही पुस्तके (हाफ लायन आणि जुगलबंदी), त्रिपुरदमन सिंग ह्यांचे पुस्तक, हिंदुत्ववादी चळवळीबाबत संशोधित भूमिका मांडणारी पुस्तके प्रत्यक्षात आली कारण अशा विषयांवर असलेली अघोषित बंदी संपुष्टात आलेली आहे, कारण संपादक आणि बाकी बौद्धिक भाई लोकांच्या वर्तुळाला नव्या सत्तेसाठी स्वतःला reorient करावं लागत आहे असं वाटतं. हिंदुत्व ही केवळ राजकीय फायद्यासाठी असलेली हिंसक आणि कोणतीही बौद्धिक भूमिका नसलेली मांडणी आहे हा गैरसमज जाऊन तिचं अधिक सखोल आकलन होणं हे भारताच्या भविष्याची कमान कुठे जाते ह्यात स्वारस्य असलेल्या कोणालाही आवश्यक आहे.

ज्योतिर्मय शर्मा ह्यांची पुस्तके, स्वपन दासगुप्ता ह्यांचं ‘reawakening the Bharat Mata’ ही पुस्तके अधिक चिकित्सक मांडणी करतात. शर्मा ह्यांची मूळ भूमिका नकारात्मक आहे, तर दासगुप्ता ह्यांची सकारात्मक, पण दोघांच्याही लिखाणात अभ्यास आहे. निलंजन सरकार ह्यांचं ‘The RSS: Icons of the Right’ हेही पुस्तक इंटरेस्टिंग आहे, विशेषतः त्यातला सावरकरांबद्दलचा काही तपशिलांचा भाग. वैचारिक भूमिका किंवा ढोबळ राजकीय प्रतिमा ह्यांना व्यक्तिगत तपशील छेद देतात हे फार मजेशीर आणि puzzling ही वाटतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसंगत प्राणीदयेची समस्या

वेगाचा विकार आणि विसंगत समृद्धी - मूळ प्रसिद्धी - लोकसत्ता ४ जुलै २०२३

कसबा पेठ पोटनिवडणूक: मत न देऊन अवलक्षण?