सरकार बाईकटॅक्सीच्या मागे हात धुऊन का लागले आहे?
स्त्रोत: इन्टरनेट महाराष्ट्र सरकारचे बाईकटॅक्सीबाबतचे धोरण - ज्यातला ताजा भाग म्हणजे सरकारने १३ मे २०२६ रोजी घेतलेला बंदीचा निर्णय- हे विसंगत आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षेची काळजी हे कारण जरी पुढे केलं जात असलं तरी त्यातून काढला जाणारा निष्कर्ष - बाईकटॅक्सीवर बंदी – हे चुकीचे आहे. सोशल मिडीयावर उमटलेल्या प्रतिक्रिया दर्शवतात तसं रेग्युलेशन करा , बंदी नको हा निष्कर्ष योग्य आहे. पण त्यापलीकडचे आणि अधिक पायाभूत मुद्दे आहेत ते म्हणजे सरकारची यूनियनबाज टॅक्सी आणि रिक्षा , app नुसार चालणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा, आणि बाईकटॅक्सी ह्या तीन गटांना दिली जाणारी भेदभावाची वागणूक आणि मार्केट हा किमान हानीचा पर्याय असताना त्यात हस्तक्षेप करून केवळ एका गटाच्या हितासाठी समाजाची आर्थिक हानी करणं. बाईकटॅक्सी चालक हे वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण ते एकटेच नियम तोडणारे खलनायक नाहीत. मुळांत वाहतूक नियम हा आपल्या सार्वजनिक जीवनातील एक अत्यंत लाजीरवाणा मुद्दा आहे. बहुतेक नागरिक हे घाबरट असतात त्यामुळे अनेकदा स...